शनिवार, २७ एप्रिल, २०२४
जिल्हा परिषद प्रशाला लामजना मराठवाड्यातील एक नावाजलेली शाळा. अनेक गुणवंत, ज्ञानी, कर्मयोगी गुरुजी या प्रशालेला लाभले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे उच्च पदस्थ ते चांगले नागरिक घडले.30 सप्टेंबर 1993 भूकंपाच्या साली मी नववी वर्गात शिकत होतो. त्या काळातचं काही वर्षे अगोदर परिट सरांचे (मडोळे गुरुजींचं) शाळेत आगमन झालं. सर्व जण त्यांना प्रेमाने परिट सर म्हणत असत. वाघोलीकर सर प्रेमाने त्यांना 'बाबुराव' या नावाने हाक मारत असत. पांढरा शुभ्र नेहरु शर्ट, पांढरी पॅंट व डोक्यावर गांधी टोपी, चेहरा सदैव प्रसन्न व हसरा. परिट सर मला सानेगुरुजींसारखे दिसत. जिल्हा परिषद प्रशाला लामजना येथे सकाळी परिपाठ सुरु झाला की, प्रार्थनेचे सूर मैदानात घुमत असत.प्रार्थनेची ऑर्डर दिली जायची परिट सर खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची प्रार्थना चढ्या आवाजात तालासुरात गात असत. त्यांच्या सुरेल आवाजाने वातावरण सारं बदलुन जात असे. सर मुलांना नियमित पसायदान म्हणायला सांगत असत.भींतीवर संपूर्ण पसायदान त्यांनी पेंटरकडुन लेखन करुन घेतलं होतं. वर्गभरल्याबरोबर दररोज मुलांना ते पसायदान वाचायला सांगत. नित्य परवचा. सरांचा आवाज अतिशय गोड तसाचं मोठा व स्पष्ट सर्व शाळेत घुमत असे. गुडसुरचे मधुकर दत्तात्रय जोशी गुरुजी शाळेत आले. जोशी सर, असावे घरकुल आपुले छान हे गीत गात असत.त्यांचाही आवाज अत्यंत मधुर . खरोश्याचे स्वामी सर कुसुमाग्रजांची कविता व शारदास्तवन गात असत.आधुनिक काळात शाळाशाळात ब्लुटुथ कनेक्टेड डिव्हाईस आले गायन दुर्मीळ झाले असे म्हणावे लागेल. स्वामी सर पेटी वाजवत. पेटीचे सूर वातावरणात दरवळत असत.वातावरण एकदम बदलुन जात असे. एकदा प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते लामजना प्रशालेत आले होते. शाळा सुटताना दररोज , ध्यास एक साधका, अंतरात ठेव तू जाण यत्न देव तू हे सामूहिक गीत नेहमी गाईले जायचे.सांगवीचे मुळजे सर क्रीडा तासिकेनंतर गीतगायनासाठी मुलांना रांगेत बसवत. टेंकाळे सर विज्ञानाचे नियमित प्रयोग दाखवत तर वडवळे सर सकाळपासुन मुलांना गणिताचे मार्गदर्शन करत असत. बिडवे सर मुलांना शिस्त शिकवत असत. परिट सर प्राथमिकच्या 1 ते 4 वर्गातील मुलांना नियमितपणे शिकवत. ते मुलांचे नियमित प्रकट वाचन घेत असत.वर्गात खेळ घेत असत.गाणे तालावर गात असताना आनंदाने मुलांना खांद्यावर घेऊन नाचत असत. 30 सप्टेंबर 1993 साली आलेल्या भूकंपाने होत्याचे नव्हते झाले.परिट सरांनी लोकांना भूकंपातून सावरण्यासाठी मदत केली. सर्वांचे मनोबल वाढवले. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो या गीतातून ते मुलांना देशभक्तीची प्रेरणा देत असत. परिट सरांचे गाव म्हणजे लामजना गावापासुन 10 कि.मी. अंतरावर असणारे किल्लारी गाव. व्यापा-यांचे अत्यंत सधन व श्रीमंत गाव. व्यापार व शेती भरभराटीला आलेली. किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्यामुळे भरभराटीला आलेले गाव. किल्लारी गावातून परिट सर बसने नियमितपणे शाळेत येत असत. त्यांना आजारी पडलेले कधीही पाहिलेलो नाही. सर नियमितपणे योगा करत असत. सेवानिवृत्तीनंतर त्यांचा उत्साह थोडासुद्धा मावळलेला नाही. ते सेवानिवृत्त झाल्यासारखे कधीचं वाटले नाहीत.ते लोकशिक्षक होते. परिट सर नियमितपणे शेताकडे जात असत.त्यांचा एक मुलगा श्री. निलमकुमार सुद्धा शिक्षक आहेत. सर अत्यंत मोकळ्या मनाचे, प्रामाणिक सेवावृत्ती असणारे गुरुजी होते. सरांची भेट झाली तर अत्यंत प्रसन्न मनाने हस-या चेह-याने बोलत असत. समोरच्या व्यक्तीला मान देत असत. कसं काय बरं चाललय का? सर्वांची आस्थेने चौकशी करत असत. अबोल माणसाला एका क्षणात बोलकं करण्याची सरांमध्ये क्षमता होती. परिट सरांचे अनेक विद्यार्थी जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर अत्युत्कृष्ट कार्य करीत आहेत. सरांचे जीवन म्हणजे चालते बोलते एक विद्यापीठ विचारपीठचं म्हणा ना! संस्कारांचा व अमुल्य अशा विचारांचा एक महान ठेवा म्हणजे परिट सर. निराश झालेल्या माणसाला सकारात्मक विचार करायला सरांनी शिकवलं.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत्व व सत्व कसे टिकवावे याचे पाठ सरांनी दिले. सौजन्यशिलता, मृदूपणा,विवेक,वैज्ञानिक दृष्टीकोन यांनी परिपुर्ण असलेले परिट सरांचे भारतीय संस्कृतीवर अत्यंत प्रेम होते. मुलांना मारहाण न करता सर प्रेमाने समजावुन सांगत. प्रसंगी पाठीत धपाटे घालत परंतु त्यांची ही कृती त्यात ही प्रेम दडलेले असे. मुले ही देवाघरची फुले आहेत.मुलांचे बाल मन शब्दाने अथवा कृतीने दुखावणार नाही याची सर काळजी घेत असत. शेडोळचे सुतार गुरुजी परीट सरांचे नेहमी नाव काढत असत. किल्लारीचे जिडगे सर पाचवी ते सातवीच्या वर्गाला विज्ञान विषय शिकवत असत. शाळकरी मुलांना परिट सरांनी फूलांप्रमाणे जपले. हुशार मुलांना सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर कमजोर मुलांचे उपचारात्मक अध्ययन सरांनी पुर्ण केले. सरांनी मुलांना स्वंय-अध्ययनाची सवय लावली.त्यांना विद्यार्थ्यांविषयी प्रचंड माया व खुप जिव्हाळा वाटत असे.मुलांसोबत मूल होऊन सर रममाण होत असत. महापुरुषांच्या रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत. कदम सर, स्वामी सर, आळंगे मॅडम, जगताप सर, नंदर्गे सर, शेख सर, वाघोलीकर मॅडम व सर ,सदाफुले सर व मॅडम, मोरखंडे सर, बिडवे सर, अंबुरे सर, सोनकांबळे सर,गाढे सर, बोधले सर, जवळपास 40 शिक्षकांची टीम म्हणजे ज्ञानियांची मांदियाळी. परिट सर साक्षात सानेगुरुजींचा वारसा घेऊन पुढे निघालेले शिक्षणपंढरीतले ज्येष्ठ वारकरी.सरांनी योग साधनेने आजारावर पण मात केली होती. सरांच्या अचानक निघुन जाण्याने एक मोठी विचार पोकळी निर्माण झालेली आहे. सरांच्या आठवणीने कित्येकांच्या डोळ्यांत अश्रु तरळले आहेत. सरांना शांती मिळो म्हणुन परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आज ही लामजना गावात परिट सरांचे ग्रामस्थ नाव घेतात.आठवणी काढतात. या सर्व गुरुजनांचे कोटी कोटी उपकार आहेत.आज लामजना गावातील कित्येक नागरिकांना सरकारी नौकरीवर जाता आले.खाजगी क्षेत्रातही लोकांनी नाव लौकिक मिळवलेला आहे. गुरुंनी दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवु हा पुढे वारसा.🌷🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा