शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४
*मार्गशीर्ष अमावस्या*
*( वेळा अमावस्या)*
आज वेळाअमावस्या हा सण होता. मराठवाडा व कर्नाटकच्या काही भागात हा सण मोठ्या आनंदानं साजरा केला गेला.आजची अमावस्या दूपारी 12:22 नंतर असल्यामुळे यावर्षी पुजा करण्यास बराचं उशीर झाला.तरीही मोठ्या आनंदाने नटुनथटून लोक घरुन निघाले होते.शहरात राहणा-या लोकांनी मिळेल त्या वाहनाने गावाकडे धाव घेतली.तर शहरातील लोकांनी कोरोनामुळे बागेत व घरीचं वनभोजन करणे पसंद केले.सकाळी लवकर उठुन सायकलीवर गेलेल्या घरातील माणसांनी कोप तयार केली.कडब्याच्या पेंड्या लावुन झोपडी तयार केली. पाच पांडव, द्रौपदी, कर्ण या देवांची प्रतिष्ठापना केली.दगडांना चुना लावुन देवाची परंपरेप्रमाणे प्रतिष्ठापना केली.परंपरेप्रमाणे ठरलेली जागा किंवा आंबा,आपटा,बोरं,या झाडाखाली जागा निवडली गेली.झाड नसेल तर उन्हातचं देव मांडले गेले.दूपारी बैलगाडीत बसुन येळवस मोठ्या थाटात शेतात पोहंचली.काही लोकांनी वाहनात बसुन हजेरी लावली.वेळ अमावस्या सणानिमित्त रात्रभर जागुन अनेक पदार्थ तयार केले जातात.फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेनुला लाजवतील असे पदार्थ याचं दिवशी फक्त तयार होतात.पांडवांची रितसर पुजा मांडुन शिवार आवाजांनी घुमु लागले.हर हर महादेव,हर भगत राजो हार बोला.व्हलगे व्हलगे सालन पलगे,या पारंपारिक घोषणांनी पांडवा भोवताली पाणी शिंपडुन देवाला हाका मारण्यात आल्या.परिसरात असलेल्या सर्व देवांना मारुती,म्हसोबा,खंडेराया,
महादेव नैवद्य दाखवण्यात आला.तोबातोबा करुन माफी मागण्यात आली.मग शेत शेजारी,घराचे शेजारी यांना बोलावुन भोजनाला सुरुवात झाली.आजच्या दिवशी बाजरी व ज्वारीचे उंडे, सर्व भाज्या मिसळुन तयार केलेली आंबट भजी,ज्वारी सडुन तयार केलेला खिचडा ( आंबट भात) साधा भात,वाग्याचं भरीत,ताकात पीठ शिजवुन तयार केलेलं अंबील( फोडणी दिलेलं आंबट ताक) ,शेंगदाण्याच्या पोळ्या,धपाटे,तांदळाची किंवा गव्हाची खीर,बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी,वेगवेगळ्या चटण्या,लोणचं,शेंगदाणा व तीळाचे लाडू असे कित्येक मेनु जेवणात होते.सर्वांनी हसत खेळत भोजनाचा आनंद घेतला.आजचे भोजन पचायला हलके व जीवनसत्वयुक्त होते.अंबील पिल्यानंतर काही जणांच्या डोळ्यात झोप दाटून आली.जेवणाच्या मेजवानीनंतर मग शिवार भ्रमंतीला सुरुवात झाली.शेतातील डहाळे,वाटाण्याच्या शेंगा,तुरीच्या शेंगा,बोरं याचा आस्वाद घेण्याबरोबर निसर्गाचे निरीक्षण करण्यात बाल गोपाळांचा वेळ गेला.मग त्यात विविध खेळांची भर पडली.कोणी कॅरम,बुद्धीबळ आणलेला तर कोणी लपाछपीचा खेळ सुरु केला.कोणी मोकळ्या रानात क्रिकेटचा डाव मांडला.काही जणांनी हिरवं झाड पाहुन दूपारच्या गाढ झोपेचा आनंद घेतला.मुलांच्या गोंधळामुळे कांही जणांची झोपमोड झाली. मोहोळाच्या शोधात शिवारभर फिरुन मध खाणा-यांचा रुबाब पाहण्यासारखा होता.
दूपारनंतर भोजनाचा पुनश्च आस्वाद घेता - घेता दिवेलागणीची वेळ झाली.असचं शिवार पुन्हा पिकु दे म्हणुन देवाची पुन्हा प्रार्थना करण्यात आली.बोळीत दूध व शेवाया घालून दूध ऊतू घालून कोणत्या भागात पीक अधिक पिकेल याचा अंदाज बांधण्यात आला.पांडवासमोर दिवे पाजळण्यात आले.ईडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे अशी देवाला मनोमन प्रार्थना करुन येळवस मोठ्या आनंदाने घरी परतली.काही भागात रात्री हेंडगा पेटवुन शिवारभर फिरण्याची प्रथा आहे.
आपली संस्कृती आपली परंपरा थोर तर आहेचं पण जगावेगळी.धन्य-धन्य आपले पुर्वज व त्यांनी निर्माण केलेली संस्कृती
आपला
श्याम गिरी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा